रत्नागिरी : राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये २४ सप्टेंबर ते नऊ ऑक्टोबर या कालावधीत कुष्ठरोग शोध अभियान २०१८-१९ राबविण्यात येणार असून, शारीरीक तपासणीसाठी घरी येणाऱ्या आशा कर्मचारी व पुरुष स्वंयसेवक यांना सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.
जिल्हाधिकारी सभागृह येथे आयोजित कुष्ठरोग शोध अभियान २०१८-१९ जिल्हास्तरीय समन्वय समितीची सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, ‘जिल्ह्यामध्ये कुष्ठरोग रुग्णांचे प्रमाण अगदी कमी आहे. जिल्ह्यात ४१ कुष्ठरोग रुग्ण असून, त्यामधील ३८ संसर्गजन्य, तर तीन असंसर्गजन्य आहेत. याआधी कुष्ठरोग प्रमाण लक्षात घेऊन जिल्ह्यामध्ये हे अभियान राबविण्यात येत होते; पंरतु हा रोग पूर्णपणे नष्ट करण्यासाठी जिल्ह्यामधील कुष्ठरोग प्रमाणाचा विचार न करता सर्व जिल्ह्यांमध्ये हे अभियान शासनानकडून राबविण्यात येत आहे. कुष्ठरोग हा आजार संसर्गजन्य असला, तरी तो बरा होणार आहे. त्यासाठी शासनाकडून विनामूल्य औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत.’
‘कोणताही संदेश बालकाकडून पालकापर्यंत लवकर पोहचतो. म्हणूनच शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेमध्ये सकाळी प्रार्थनेच्या वेळी कुष्ठरोगबाबतची शपथ द्यावी. शाळेमध्ये कुष्ठरोगाबद्दल जनजागृत्ती करण्यासाठी प्रभातफेरी काढण्यात यावी,’ अशा सूचना जिल्हाधिकारी चव्हाण यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत; तसेच जिल्ह्यात अंगणवाडी सेविकाही मोठ्या संख्येने असून, त्यांनी ही या कुष्ठरोग शोध मोहिमेत सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या अभियानाबाबत माहिती देताना सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. आर. आर. हाश्मी म्हणाले, ‘हे अभियान २४ सप्टेंबर ते नऊ ऑक्टोबर या कालावधीत पोलिओ मोहिमेच्या धर्तीवर राबविण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्व घरांचे, तर शहरी भागात झोपडपट्टी, वीटभट्टी कारखाने, बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी आशा व त्याच विभागातील एक पुरुष स्वंयसेवक घरातील सर्व सभासदांची तपासणी करणार आहेत. यासाठी आशा व पुरुष स्वयंसेवक यांना प्रशिक्षण व मानधनही दिले जाणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक घरातून जाऊन तपासणी करण्यासाठी आशा कर्मचारी व पुरुष स्वयंसेवक यांच्या एक हजार ४६० टीम तयार करण्यात आल्या आहेत. हस्तपत्रिका वाटप, पोस्टर्स, बॅनर्स, स्थानिक वर्तमानपत्र आदी माध्यमांतून या अभियानाची प्रसिद्धी करण्यात येत आहे.’